Uday Samant on Eknath Shinde : सत्तास्थापनेबाबत माझी कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री दिल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासाठी चर्चा सुरू असून यात नाराजीनाट्याचा अंक रंगल्याची चर्चा आहे. दुसरीकडे चर्चेकरता दिल्लीत गेलेले काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी सातारा येथे परतले आहेत. त्यामुळे नाराजी नाट्याच्या चर्चेला जोर आला आहे. दरम्यान, या सर्व नाट्यावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर महायुतीचे नेते, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले होते. त्यानंतर आज मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींवर सोपविल्यानंतर शिवसेनेकडून (शिंदे) गृहमंत्री पदावर दावा केला जात आहे. दरम्यान, या चर्चांवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> Eknath Shinde: मोठी बातमी! महायुतीची आजची बैठक रद्द; एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी जाणार, नाराजीनाट्य की वेगळे काही?

उदय सामंत एएनआयशी बोलताना म्हणाले, “नाराजीच्या चर्चा सुत्रांच्या हवाल्याने होत आहेत. आज सकाळी ५ वाजेपर्यंत आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर होतो. ते उद्या परतणार आहेत. हल्ली मीटिंग फक्त वैयक्तिक हजर राहूनच होते असं नाही. मोबाईलवरून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेही होते. ते चर्चा करणार आहेत. मंत्रिमंडळ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.”

संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर काय म्हणाले उदय सामंत?

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे उघडपणे गृहखाते एकनाथ शिंदेंकडे द्यावे, ते कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम व्यक्ती आहेत, असे सांगत आहेत. यावर उदय सामंत म्हणाले, “संजय शिरसाट काय म्हणाले आहेत, हे मला माहीत नाही. मी त्यांच्याशी बोलेन आणि प्रतिक्रिया देईन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

“मी खरं सांगतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही. पण एकनाथ शिंदे यांना ताप होता. सर्दी होती. त्यांची प्रकृती चांगली नाही. पण ते नाराज नाहीत. चांगल्या हवामानासाठी ते गावी गेले आहेत”, असंही स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं.