विरार रुग्णालय आग दुर्घटना वसई : विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला १५ दिवसांत चौकशी करून अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेने रविवारी रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापक डॉक्टरांना अटक केली आहे. शुक्रवारी विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयाला लागेलल्या आगीत १५ करोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने पालघरचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. त्यात वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी., मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी आणि मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ चे उपायुक्त संजयकुमार पाटील यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसांत शासनाला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसळ यांनी दिली. रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापकांना अटक या आग दुर्घटनेची चौकशी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखे ३ च्या पथकाकडे सोपविण्यात आली होती. प्रथमदर्शनी या आगीला रुग्णालय व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी रात्रीच रुग्णालयाच्या तीन व्यवस्थापकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ दिलीप शाह आणि डॉ शैलेश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांनादेखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.