सांगली : महापालिकेचे माजी सभापती अशोक कांबळे यांनी रिपाइंच्या आठवले गटात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. महापालिका निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे, रमजान मुजावर, सहसचिव संजय कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्य कांबळे, महिला आघाडीच्या छायाताई सरवदे, संदेश भंडारे, अरूण आठवले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले, दीन दलित शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळे सारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मध्ये भाजपाने आरक्षित जागा आमच्या पक्षासाठी सोडाव्यात, अन्यथा सर्वच जागांवर आमच्या पक्षाच्या विचाराचे लोक मैदानात उतरतील, याचा फटका निश्चितच भाजपला बसेल असा इशाराही त्यांनी दिला.
कांबळे यांनी महायुतीने लोकसभा निवडणुकीवेळी शिर्डी आणि सोलापूर हे दोन मतदार संघ आरपीआयला देण्यात आले नव्हते. यामुळे त्यांनी महायुतीतून बाहेर पडत उघडपणे अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. याचा फटका मिरज विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराला बसला होता.