उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाखांच्या मर्यादेत कर्जमुक्ती जाहीर केल्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढवायला हवी व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी नवनियुक्त राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली.

“मला वाटतं की सत्तर टक्के लोकांसाठी सरसकट कर्जमाफी होणार आहे. माझं मत आहे की २००७, २००८, २००९, २०१० त्याच्या अगोदरचा कर्जबाजारी असेल तर त्याला घेतला पाहिजे. जे विविध योजनांच्या घोषणातून सुटले असतील त्यांना कसं कव्हर करता येईल हे शोधणे गरजेचे आहे. जे दोन लाखाच्या वर आहेत त्याला सुद्धा कर्जमाफीत कसा आणता येईल हे पाहायला हवं.” कडू म्हणाले  “मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. दोन लाखाचे कर्ज माफी पूर्ण झाल्यावर मग पुढचा कार्यक्रम समोर येईल.”

एक फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. कडू हे तसे मूळचे शिवसेनेच्या विचाराचे. पण नंतर त्यांचे रस्ते दुभंगले. ते पहिल्यांदा निवडून आले ते २००४ मध्ये तत्कलीन राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या विरोधात. आमदार म्हणून निवडून आल्यावर सुद्धा कडू शोले स्टाईल आंदोलन किंवा लोकांच्या कामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर हात उचलणं अशा आंदोलनांच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहिले.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार निवडून आले, एक स्वतः कडू आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या आदिवासीबहुल मेळघाटातून राजकुमार पटेल त्यानंतर कडूंनी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू असताना उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. सर्व शेतकऱ्यांची कर्ज सरसकट माफ होणार का असा प्रश्न विचारला असता “होणारच ना न व्हायला काय झालं?” असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जाहीर केलेली, कर्जमाफी गुंतागुंतीची होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाठपुरावा करेन, नाही तर आंदोलन सुद्धा करेन. मंत्र्यांनी आंदोलन करू नये असंं कुठे म्हटले? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे सांगितले नागपूरच्या अधिवेशनात दोन लाखापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी जणी कर्जमाफी जाहीर झालेली असली तरीसुद्धा दोन लाखांच्या वर थकीत कर्ज नसलेल्या शेतकर्‍यांसाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्यात येईल. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा नवीन योजना जाहीर करण्यात येईल.