राजापूर :ओणी पाचल मार्गावर पाचल कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस व दुध वाहतुक करणारा आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एसटी चालक, वाहकासह एक विद्यार्थी व टेम्पो चालक व क्लिनर असे पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. एस. टी. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या दरम्याने सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर हा अपघात झाला.
राजापूर आगाराची आजिवली रत्नागिरी ही बस {(क्रमांक एम. एच. २० – २२७१ ) घेऊन चालक आर. एच. देशमुख व वाहक विजय शिंदेदेसाई हे आजिवलीकडून पाचल मार्गे रत्नागिरीकडे जात होते. गाडीला अपघात झाला त्यावेळी चालक वाहकासह गाडीत ४० प्रवाशी होते. गाडी सौंदळ पाटीलवाडी येथील वळणावर चढावात असताना समोरून दुधाने भरलेला आयशर टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ जीजे ३८८०) हा भरधाव वेगाने आला, यावेळी टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने समोरून येणाऱ्या एस.टी. बसला जोरदार धडक दिली. व पुढे जाऊन हा टेम्पो रस्त्याच्या बाजुला कोसळला. तर टेम्पोची जोरदार धडक बसल्याने एसटी बसही रस्त्याच्या साईटपट्टीच्या खाली कलंडली. एसटी बस चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रवाशांनी सांगितले. या अपघातामुळे घाबरलेल्या एसटी बस मधील प्रवाशांनी मागील सुरक्षिततेसाठी असलेला दरवाजा उघडून एसटी बस बाहेर उडया घेतल्या.
या अपघातात एसटी चालक आर. एच. देशमुख तसेच अथर्व लिंगायत हा विद्यार्थी असे दोन जण किरकोळ जखमी झाले. तर टेम्पो चालक बाळाप्पा रामचंद्र हागित याच्यासह त्याचा क्लिनरही किरकोळ जखमी झाले. या जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. एसटी बस मधील किरकोळ जखमी विद्यार्थ्याला प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर आगार प्रमुख अजित घोसार्डे, कार्यशाळा अधिक्षक प्रकाश झोरे, स्थानक प्रमुख श्री. कदम हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहचले. तर राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादवही आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी सर्व प्रवाशांना सुखरूप बस बाहेर काढून जखमींवर उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले. तर अन्य प्रवाशांना दुसऱ्या पर्यायी बसने रवाना करण्यात आले. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.