मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर येथील फूडमॉल रात्री ११ नंतर बंद ठेण्याचे निर्देश रायगड पोलिसांनी दिले आहेत. गेल्या दोन वर्षांत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लूटमारीच्या २१ घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रायगड पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वी सांगली येथील सोने व्यापाऱ्यांना अपहरण करून लुटण्याची घटना घडली होती. या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन रायगड पोलिसांनी ही पावले उचलली आहेत.
फूडमॉलचालकांना हॉटेल परवाना किती वाजेपर्यंतचा देण्यात आला आहे, याची चाचपणी पोलिसांनी सुरू केली होती. यात सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंतच हॉटेल चालवण्याची परवानगी असल्याचे समोर आले. त्यामुळे नियमानुसार रात्रीच्या वेळी फूडमॉल बंद ठेवणे गरजेचे असल्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी म्हटले आहे.  मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड पोलीस कार्यक्षेत्रात हॉटेल्सवर यापूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. यानंतर या परिसरातील महामार्गावरील लूटमारीच्या घटनांना आळा घालण्यात यश आले होते. हाच फॉम्र्युला आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकेल, मात्र त्यांची सुरक्षितता नक्की वाढेल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल व्यवसायिकांनी अशा कारवाईला सुरुवातीला विरोध केला होता. मात्र या कारवाईमागचा हेतू चांगला असल्याने त्यांनी नंतर पोलिसांना सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील फूडमॉलचालकांनी नियमानुसार हॉटेल्स वेळेत बंद करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिंदे यांनी केले आहे. तर या निर्णयामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेशसह रात्रीच्या वेळी पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होईल, असे मत फूडमॉलचालकांनी व्यक्त केले आहे.