धुळे : मध्य प्रदेश आणि गुजरातलगत असणाऱ्या तापी खोऱ्यातील धुळे जिल्ह्यात आसपासच्या राज्यातील उद्योगही गुंतवणुकीस उत्सुक असल्याचे अलीकडेच गुंतवणूक परिषदेतील सामंजस्य करारातून अधोरेखित झाले. चार विद्रावक पदार्थ (सॉल्व्हंट) प्रकल्पांनी धुळे इंधन केंद्र म्हणून नावारूपास आले असले तरी कृषी आधारित उद्योगांवरच जिल्ह्याचा औद्योगिक विकास अधिक अवलंबून आहे.

साधारणत: अडीच दशकांपूर्वी नंदुरबार स्वतंत्र झाल्याने जिल्हा विभाजनात धुळ्याचे क्षेत्रफळ घटले. जिल्ह्याच्या वाट्याला धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा हे चारच तालुके आले. तेव्हा उपलब्ध तोकड्या सेवा, सुविधा आणि प्रस्तावित योजनांचा आधार घेत धुळ्याची हळूहळू विकासाकडे वाटचाल सुरू झाली. तापी, पांझरा, बुराई, अरुणावली या प्रमुख नद्या जिल्ह्यातून वाहतात. त्यांची एकूण लांबी ४८५ किलोमीटर आहे. जोडीला अक्कलपाडा, सुलवाडे-जामफळ प्रकल्प ही मोठी जलाशये आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेतही धुळ्याचा समावेश आहे. जिल्ह्यात १२ मध्यम प्रकल्प असून त्यांच्या ८६,००४ हेक्टर लाभक्षेत्रापैकी जवळपास ३७,३१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे,

जिल्ह्याचे चालू किमतीनुसार दरडोई जिल्हा उत्पन्न एक लाख ७९ हजार ७०० रुपये आहे. निती आयोगाच्या अहवालाच्या गरिबी निर्देशांक अहवालात सर्वाधिक गरीब लोक असणाऱ्या यादीत धुळ्याचा दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील २१.४४ टक्के नागरिक गरिबीत जीवन जगत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०,५०,८६२ तर, मानव विकास निर्देशांक ०.६७१ आहे. पंतप्रधान आवास योजनेत मंजूर झालेल्या ६४ हजार ५७६ पैकी ६० हजार ३५६ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. या योजनेसाठी शासनाने २०२४-२५ साठी ९३ हजार ९७० घरांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख १७ हजार वीज जोडण्या असून २०२३-२४ वर्षात ११,८१,१५०.३३ किलोवाॅट तास वीज वापर झाला आहे.

दळणवळण सुविधांमुळे धुळ्याच्या विकासाला हळूहळू चालना मिळणार आहे. नियोजित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गामधील धुळे (बोरविहीर, धुळे) ते नरडाणा हा साधारणतः ७१६ कोटी रुपये खर्चाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यास मुंबई-आग्रा, नागपूर-सुरत, धुळे-सोलापूर, दोंडाईचा-मालेगाव, साक्री- पिंपळनेर- नामपूर-देवळा आणि सोनगीर-दोंडाईचा- शहादा-अंकलेश्वर अशा सहा राष्ट्रीय महामार्गांची जोड लाभली आहे. गोंदूर व शिरपूर येथे धावपट्टीची सोय आहे.

औद्योगिक गुंतवणुकीला चालना

धुळे हा राज्यात औद्योगिकदृष्ट्या मागास जिल्हा आहे. दशकभरात जे उद्योग सुरू झाले, ते मुख्यत्वे कृषी आधारित आहेत. औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पुढाकार घेतल्याने पहिल्या टप्प्यातच जवळपास ३५० पेक्षा अधिक उद्योग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले. सध्या येथे चार विद्रावक पदार्थ (सॉल्व्हंट) प्रकल्प असून त्यांच्या उत्पादनांनी जिल्हा इंधन केंद्र म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात २०२३-२४ काळात २७१ कारखाने कार्यान्वित असून १० हजारहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध झाला. सध्या उद्योग आधार असणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांची संख्या १४ हजार ६७ इतकी आहे. नरडाणा औद्योगिक वसाहतीत दोन मोठ्या सिमेंट कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. पायाभूत सुविधा व दळणवळण व्यवस्थेने अन्य उद्योगही चाचपणी करीत आहेत.

आठ लाखांहून अधिक जनधन खाती

अग्रणी बँकेच्या माहितीनुसार गेल्या वर्षात जिल्ह्यात ६३ हजार १८९ खातेदारांना ४४१.९१ कोटी तर, २०२४-२५ मध्ये ५१ हजार १५१ खातेदारांना ४७५.५२ कोटी रुपये कर्ज वितरित झाले, पंतप्रधान जनधन खात्यांची संख्या आठ लाख ५५ हजार १८७ इतकी आहे. जिल्ह्याचे कर्ज-ठेवींचे गुणोत्तर ७९.३८ टक्के आहे. बँकेतील ठेवी १४,३९४.२५ कोटींवर पोहोचल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रति लाख लोकसंख्येमागे ७४ खाटा

जिल्ह्यात १३९० प्राथमिक, २८८ माध्यमिक आणि १७६ उच्च माध्यमिक शाळा आहेत. २०२३-२४ वर्षात एकूण पटावरील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांची संख्या एक लाख ५१ हजार ७३४ तर माध्यमिक शिक्षण घेणारे ९४ हजार ५० विद्यार्थी होते. इयत्ता १० वीत शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार ३९८ विद्यार्थ्यांची नोंद झाली. उच्च माध्यमिक शिक्षण एक लाख ५१ हजार ३०४ विद्यार्थी घेत आहेत. जिल्ह्यात १३ रुग्णालये, २६ दवाखाने, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २३२ आरोग्य उपकेंद्रांमार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. प्रतिलाख लोकसंख्येमागे ७४ खाटा असे प्रमाण आहे.