सांगली : शहरात येत्या जूनपासून महिला बचत गटाच्या महिलांकडून कचरा संकलन करण्यात येणार असून यासाठी ९ ‘ई-रिक्षा’ महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महापालिकेला ९ ‘ई-रिक्षा’ घंटागाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या ९ रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत.महाराष्ट्रात फक्त ५ महानगरपालिकांना केंद्राच्या योजनेतून या ई-रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या असून यात सांगली महानगरपालिकेचाही समावेश आहे.

या ‘ई- रिक्षा’ घंटागाडीची पाहणी उपायुक्त श्रीमती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली. तसेच सर्व महिला चालकांना या ‘ई-रिक्षा’ घंटागाडीची माहितीही देण्यात आली. मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत या महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सरवदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, शहरस्तरीय संघांचे अध्यक्षा पुष्पा सोनवळे, कुपवाडच्या अध्यक्षा कविता पवार, नितीन डोंबाळे उपस्थित होते. या ई-रिक्षा घंटागाड्यांवर शहरातील बचत गटातील ९ महिला आणि ९ सहायक कार्यरत राहणार आहेत. या महिला चालक आणि सहायक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे.या ‘ई-रिक्षा’ घंटागाड्या संध्याकाळी कार्यरत राहणार असून तिन्ही शहरातील खाऊ गल्ल्या आणि काही व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करणार आहेत.