रत्नागिरी : ज्या गावामध्ये आज मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ होतोय, त्यांनी स्पर्धेतील पारितोषिक टार्गेट म्हणून काम करायला आजपासून सुरू करावे. आपली ग्रामपंचायत ही चांगल्या पद्धतीची असली पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल गाव म्हणून तयार करु. ही नऊच्या नऊ गावं महाराष्ट्राला आदर्शवत ठरतील. या गावांना आदर्श मॉडेल बनवण्यासाठी जे जे काही निधीची आवश्यकता लागेल, ती देण्याची जबाबदारी माझी असेल असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मिरजोळे समुह ग्रामपंचायतीमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते बुधवारी झाला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील, बाळ सत्याधारी महाराज, उपसरपंच अशोक विचारे, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर कांबळे, माजी सरपंच गजानन गुरव, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य श्वेताली पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपल्या वागण्याचा सुगंध आपण चांगल्या पद्धतीने जर गावांमध्ये पसरवला तर आपण ३० दिवसांमध्ये विकासात्मक सुगंध देखील पसरवू शकतो, हे महाराष्ट्राला दाखवून देवू. मिरजोळे ग्रामपंचायत ही नवी रत्नागिरी आहे. तुमच्या बाजूला सहा महिन्यानंतर विमानतळ सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक येणार आहेत. त्याच्यामुळे माझी ग्रामपंचायत जी नवी रत्नागिरी म्हणून विकसित होते, ही रत्नागिरी शहरापेक्षा देखील चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. एवढीच तयारी आजपासून आपण करूया. ज्या गावात या अभियानाचा शुभारंभ होत आहे, त्या गावाला या अभियानात बक्षिस मिळालेच पाहिजे, असा संकल्प आपण आज करु या, असे ही सामंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, १९९२ सालानंतर गावाचा सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे या अभियानामध्ये आपण अग्रेसर कसे राहू ही त्यांच्यावर आणि त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची जबाबदारी आहे. रत्नागिरी शहरासह शहरालगतच्या ५ गावांच्या घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जमिनही एमआयडीसीने याआधीच दिलेली आहे. त्याचा डीपीआर सुरु आहे. २५ कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्या गावातील कचऱ्याची विल्हेवाट आपल्या गावातच लावली पाहिजे, अशी संकल्पना या अभियानामध्ये आहे, असे ही सामंत यांनी सांगितले. दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.