महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं आज पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. “आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, “मी आमच्या सगळ्या मुस्लीम समाजाला विनंती केलेली आहे. हनुमान चालीसेला आपण शांततेने सामोरे जावूयात. आपल्या समजाता तेढ ही आपण वाढू द्यायची नाही, अशाप्रकारचं आवाहन मी केलेलं आहे. राज ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले महाराष्ट्राची जनता याला भीक घालणार नाही, याला फसणार नाही आणि अतिशय शांततेने या सगळ्या गोष्टी होतील.”

तसेच, “शरद पवारांनी देखील आपल्या भाषणात अनेकदा सांगितलं, की प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काय होते?, किती प्रगल्भ विचार होते. प्रबोधनकार ठाकरेंचा विचार हाच छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे.” असंही यावेळी मुश्रीफ यांनी सांगितलं.

“तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी…”, राज ठाकरेंनी अल्टिमेटमवर जाहीर केली भूमिका!

याचबरोबर, उद्याच्या अल्टिमेटबाबत बोलतना मुश्रीफ यांनी “आता जे कायदेशीर असेल ते पोलीस करतील. समाजात कुणीही शांतता बिघडवू नये अशी आमची विनंती आहे.” अशा शब्दांत भूमिका स्पष्ट केली.