धवल कुलकर्णी
जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना सोशल मीडियावर एक नवे अफवांचे पीक आले आहे. मांसाहार केल्यामुळे कोरोना व्हायरस ची लागण होऊ शकते, या अफवे मुळे कुक्कुटपालन क्षेत्राची आणि शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. जगभरामध्ये थैमान घातलेला कारोना वायरसपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रात केलेल्या उपाययोजनांबाबत नितीन पवार, संजय पोतनीस आणि इतर आमदारांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या प्रश्नाला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं. “वायरस टाळण्यासाठी मांसाहार करू नये वगैरे सारख्या अफवांचे खंडण त्यांनी केलं. आरोग्य विभागातर्फे सुद्धा याबाबत कळवण्यात आले आहे आणि मी स्वतः सुद्धा याबाबत मीडियाशी बोललो आहे,” असं त्यांनी सभागृहाला सांगितले. मात्र कच्चे मांस खाऊ नये आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावावा, असं त्यांनी सांगितले. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कारोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे भयभीत होण्याचे कुठलेही कारण नाही, असं टोपे यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या अशा अफवांचा पोल्ट्री उद्योगावर परिणाम झाल्याचे सांगितले.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मान्य केले की ‘या अशा अफवांमुळे कुकूटपालन क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच व्हाट्सअपवर ही खोटी माहिती कुणी पसरवली आहे याचा शोध घेण्याबाबत पशुसंवर्धन यांनी आयुक्तांनी आठ दिवसांपूर्वी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. खोडसाळपणा केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सरकारतर्फे सायबर क्राईम विभागांना सांगण्यात येईल असे सांगितले.
विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग मार्फत होणारी तपासणी नीट होत नसल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी केली. त्यावर आपण स्वतः त्या ठिकाणी भेट देऊ, असे टोपे म्हणाले. सध्या चीन, हाँग काँग, थायलंड, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, आणि इटली सह 12 देशांतून येणाऱ्या विमान प्रवाशांना थर्मल स्कॅनिंग च्या मार्फत ताप आणि इतर लक्षणांची पाहणी केली जाते.