अहिल्यानगरः जिल्ह्यात परवा, शनिवारी १२ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली होती, काल, रविवारी २२ मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी खोळंबला आहे. पावसाने शेती पिकांचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात आज, सोमवारपासून बुधवारपर्यंत (दि. २८) पुन्हा पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ जारी केला आहे तसेच पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात १२४ महसूल मंडले आहेत. दोन दिवसांत ३४ मंडलात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात बहुसंख्य भागात आठ-दहा दिवसांपासून कमीअधिक स्वरूपात पाऊस होत आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. आज सकाळी नोंदवलेला गेल्या चोवीस तासांत झालेली मंडलनिहाय अतिवृष्टीची आकडेवारी पुढीलप्रमाणे: भिंगार ७३.३, नागापूर ७५, चिचोंडी पाटील ६६.३, चास ९३, नेप्ती ७२.८, पारनेर ६८.३, भाळवणी ९०.५, सुपा ७७, पळवे ६६, पेडगाव ९४, देवदैठण ७६.८, भानगाव ८२.८, आढळगाव ८२.८, कर्जत १०३, भांबोरा ८४.५, कोंबळी ७४.३, माही ७२, खेड १३६.३, वालवड १०३, राहुरी ६४.८, टाकळीमिया ६४.८ व ब्राह्मणी ६५ मिमी.तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे: अहिल्यानगर ५२.४, पारनेर ६२.६, श्रीगोंदे ५७.४, कर्जत ७२, जामखेड ३२, शेवगाव ४८, पाथर्डी ४२.२, नेवासा ४०.४, राहुरी ४८.८, संगमनेर ३२.१, अकोले ३७, कोपरगाव ३.५, श्रीरामपूर ८.२ व राहता १३.९. जिल्ह्यात एकूण ४३ मिमी. पावसाची नोंद झाली.

गेली दोन दिवस नगर शहर व तालुका, नेवासे, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत व राहुरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ओढेनाल्यांना पूर आला आहे. भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई आदी फळबागांचे नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यातील पावसाने भीमानदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. भीमा नदीवरील दौंड पुलाखालील नदी पात्रातील पाण्याचा विसर्ग १८ हजार ६२५ क्युसेकवर पोहोचला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने भीमा नदीकाठच्या श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.