सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुसळधार पावसाने दोघांचे बळी घेतले. तसेच वेंगुर्ले सागराला उधाण आल्याने चार होडय़ा वाहून जाण्याचा प्रसंग घडला. तसेच भातशेती पाण्याखाली गेल्याने मोठय़ा प्रमाणात शेतजमीन नापीक झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी संकटात आहे. भातशेती पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी चिखल साचला असून, खताचा डोस देणेही मुश्कील बनले आहे.
चेंदवण येथील रवींद्र कांबळी (२७) हा फीट येऊन नदीच्या पात्रात कोसळला. त्याचा त्यामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्कालीन कक्षातून सांगण्यात आले. खरेतर तो नदीपात्रात कोसळला असल्याने सकाळी ११ वाजता मृत्यू पावला.
आज संध्याकाळी ७.३० च्या सुमारास वैभववाडी तालुक्यातील उंकर्डे नेहरूनगर येथील जैयसूत याकूब रणज (५०) ही व्यक्ती वाहून गेली. महापूर आल्याने वाहून गेल्याचे सांगण्यात आले. पुराचा फटका दोघांना बसला आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील श्रीरामवाडी येथील चार होडय़ा वाहून गेल्या. मुसळधार पाऊस, सागराला उधाण व महापुराने होडय़ा वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ३ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले. सायंकाळी ४ वा. घडलेल्या या घटनेत होडय़ांचे मालक भरत निवतकर यांचे ५० हजार, सानदेव सारंग यांचे १ लाख, भद्रसेन निवतकर यांचे ५० हजार तर वैकुंठ निवतकर यांचे १ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले.
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील बिरू पाटील यांच्या गाभण म्हैशीला सर्पदंश झाल्याने ती मृत्युमुखी पडून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच कुडाळ येथे संध्याकाळी रस्त्यावर झाड पडून एक जण जखमी झाला.आंबेरी पुलावर सकाळी पाणी आल्याने कुडाळ-माणगावचा जनसंपर्क तुटला होता.