हिंगोली : राज्यात काही नव्या तालुकानिर्मितीला चालना दिली जाणार असून, अन्य तालुक्यांबरोबर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव व आखाडा बाळापूरचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिंगोली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, श्रीकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव या अप्पर तालुका निर्मितीची घोषणा केली होती. या ठिकाणी तालुकाच्या दर्जाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पुढील काळात राज्यातील इतर तालुक्यांच्या निर्मिती सोबतच गोरेगाव तालुका घोषित केला जाईल. तसेच आखाडा बाळापूर तालुक्याबाबत माहिती घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव दिले जाईल. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव निमित्त देशाचे आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे विकासकामांसाठी तसेच संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे विकासकामांसाठी निधी दिला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद प्रक्रिया व संशोधन केंद्राला १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या केंद्राचे काम सुरू आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी हळद शिजविणे व इतर कामांसाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्रीसाठी निधी दिला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.