Husain Dalwai at Nashik Satpir Dargah : नाशिक येथील काठे गल्ली भागात असलेल्या धार्मिक स्थळावर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यामुळे नाशकात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आता कोणत्याही व्यक्तीस सदर धार्मिक स्थळी जाण्यापासून मज्जाव केला आहे. दरम्यान, माजी मंत्री व काँग्रेस नेते हुसैन दलवाई हे आज तिथे पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दलवाई यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवलं.
हुसैन दलवाई म्हणाले, “न्यायालयाने तो दर्गा अनधिकृत ठरवलेला नाही. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरी माझं म्हणणं आहे की ३५० वर्षे जुन्या दर्ग्यावर अशा प्रकारची कारवाई करणं चुकीचं आहे. मी तिथे जाऊन पाहणार होतो, परंतु, पोलिसांनी मला तिथे जाऊ दिलं नाही. पोलीस मला म्हणाले, “तुम्ही आत गेलात तर इतर लोकही जातील. म्हणजेच इथले आमदार जातील. इथल्या आमदार दंगल करण्याच्या मनःस्थितीत आहेत.”
काँग्रेस नेते म्हणाले, “मी पोलिसांना सांगितलं की मी इथे दंगा शमवण्यासाठी आलो आहे. मी दंगा करण्यासाठी आलेलो नाही. समाजात एकता निर्माण व्हावी यासाठी मी इथे आलो आहे. माझं चारित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला तिथे जाऊ द्या. मी केवळ पाच जणांना घेऊन तिथे जाईन. मात्र, पोलीस मला म्हणाले की तिथे गडबड होईल. हेच पोलीस गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असतील तर ते चुकीचं आहे.”
“मी सावरकरवादी नाही”, हुसैन दलवाईंचं पोलिसांना उत्तर
दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी आरोप केला आहे की काठे गल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्यावर हुसैन दलवाई म्हणाले, कोणीही दंगा केला असेल, पोलिसांवर दगडफेक केली असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही. मी गांधीवादी आहे. मी हिंसेचं समर्थन करत नाही. मी काही गोळवलकरवादी किंवा सावरकरवादी नाही. माझी भूमिका लक्षात घ्या. मी अहिंसावादी आहे, दगडफेक करणं मला मान्य नाही. मात्र, पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही आत गेल्यावर इतर लोक तिथे जातील.”
दलवाईंकडून स्थानिक आमदाराच्या अटकेची मागणी
हुसैन दलवाई म्हणाले, “मी पोलिसांना सांगितलं की मला आत जाऊ द्या, मी काही दंगा करणारा माणूस नाही. तुम्ही दंगा करणाऱ्यांचं ऐकता, त्यांना संरक्षण देता, त्यामुळेच तिथे दंगल झाली. माझी मागणी आहे की पोलिसांनी इथल्या स्थानिक आमदाराला अटक केली पाहिजे. त्या या दर्ग्याला थडगं म्हणतात, जे चुकीचं आहे. थडगं आणि दर्ग्यात फरक आहे. त्या म्हणतात की आम्ही तिथलं थडगं पाडणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार. त्यांना सर्वात आधी अटक केली पाहिजे. पोलिसांनी तेवढी हिंमत करावी. मला कशाला अटक करता.”