ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो असं जर भाजपाला वाटत असेल तर मी आज त्यांना खुलं आव्हान देतो की आत्ता निवडणुका घ्या. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो.बघू महाराष्ट्राची जनता कुणाला कौल देते? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी म मालेगावच्या सभेतून भाजपाला आव्हान दिलं आहे. मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा सुरू झाली आहे. त्यांच्या भाषणाचा संपूर्ण रोख हा एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे असल्याचं दिसून आलं.

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

“तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातल्या भाजपाला विचारतो आहे. तुम्ही म्हणजे भाजपा मिंध्यांच्या नेतृत्त्वात निवडणुका लढणार आहात का? ते जाहीर करा. होय आम्ही मिंधेंना नेता मानून निवडणुका लढणार हे भाजपाने जाहीर करावं. आज भाजपाला मी आव्हान देतो आहे की जर त्यांना हे वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली तरीही ठाकरेंपासून शिवसेना तुम्ही तोडू शकत नाही. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा.” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या

मी तर म्हणतो तातडीने निवडणुका घ्या. तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो. बघू महाराष्ट्र कुणाला कौल देतो? स्वतःकडे कर्तृत्व शून्य. गद्दारी करून मुख्यमंत्री झाले तरीही तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतं इकडेच तुम्ही हार झाली आहे. हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला. राजकारणातल्या आईच्या कुशीवर वार करणारे हे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासोबत फिरणार आहेत. लढाई मी समजू शकतो.

दिसला भ्रष्ट माणूस की घे भाजपात

भ्रष्टाचाराविरोधात लढाई कोण करणार? भारतीय जनता पक्ष? पण भाजपाने एक लक्षात ठेवावं की काश्मीर ते कन्याकुमारी अशी यादी काढली तर हातभरापेक्षा जास्त मोठी होईल. संपूर्णपणे तुम्ही विरोधी पक्षातल्या लोकांवरती आणि नेत्यांवरती आरोप करून त्यांना पक्षात घेतलं आहे. काल परवाकडे त्यांचाच एक आमदार विधान परिषदेत बोलला आहे की आमच्याकडे निरमा पावडर आहे. निरमा पावडरने जे भ्रष्ट लोक आमच्याकडे येतात त्यांना धुतलं की ते स्वच्छ होतात. काय मोठ्या मनाची माणसं आहेत बघा. भ्रष्टाचार शिल्लकच ठेवायचा नाही. दिसला भ्रष्टाचारी घेतला पक्षात हे भाजपाचं धोरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय जनता भ्रष्ट नाही

सत्तेच्या हपापलेपणासाठी तुम्ही भ्रष्ट लोकांना पक्षात घेत आहेत. माझी भारतीय जनता भ्रष्ट नाही. चांगली माणसंही भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांना मी विचारतोय भ्रष्ट लोकांच्या मेळ्यात तुम्ही स्वच्छ माणसं कशी काय जाऊ शकता? दुसऱ्याच्या कुटुंबावर आरोप करणार. यांच्या नेत्यांवर आरोप केल्यावर भारताचा अपमान होतो. माझा भारत एवढा क्षुद्र नाही. मोदी म्हणजे भारत हे मान्य आहे का तुम्हाला? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.