अहिल्यानगर : जिल्ह्यातील तीर्थस्थानांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकासाची प्रक्रिया राबविताना संस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांनाही महत्त्व दिले पाहिजे. तीर्थस्थानांच्या विकासातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
बेलापूर खुर्द (ता. श्रीरामपूर) येथे श्री हरिहर केशव गोविंद संस्थानच्या सभामंडप कामाची सुरुवात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमास हभप पीर महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चेडे, दीपक पटारे, इंद्रभान थोरात, जितेंद्र छाजेड, बेलापूरच्या सरपंच प्रणाली भगत, उपसरपंच दीपक बारहाते, उपसभापती अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरातन वारसा जतन करणे हे सर्वांचेच कर्तव्य ठरते. विकासाची प्रक्रियेत परंपरा आणि वारसांना महत्त्व दिले पाहिजे. अध्यात्मिक स्थळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जिल्ह्यात अध्यात्मिक पर्यटन, औद्योगिक विकास आणि साहसी पर्यटनासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पर्यटकांना सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रवरा नदीकाठी घाटाचे बांधकाम करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी हजरत सैय्यद शाह बाबा यांच्या १८९ व्या उरुसाच्या निमित्ताने दर्ग्यावर जावून दर्शन घेतले. बेलापूरच्या तलाठी कार्यालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.