अहिल्यानगर: अहिल्यानगर व मराठवाड्यासह १७ जिल्ह्यांतून गोव्यात आणलेल्या अनैतिक मानवी तस्करीच्या १५८ प्रकरणांत संस्थेने यशस्वी हस्तक्षेप केला. त्यामुळे या संदर्भात पोलीस, सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी व्यापक जागृती मोहीम राबवावी, असे आवाहन गोव्यातील ‘अर्झ’ (अन्याय रहित जिंदगी) या संस्थेचे संस्थापक अरुण पांडे यांनी नगरमधील परिसंवादात बोलताना केले.
स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार प्रकल्पाने गोव्यातील देहव्यापाऱ्यात मोठ्या संख्येने आढळणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बालिका व महिलांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय संवेदनाक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत बोलताना ‘अर्झ’ चे पांडे यांनी वरील माहिती दिली.
महाराष्ट्रातील अहिल्यानगर, मराठवाड्यासह विविध १७ जिल्ह्यांतून गोव्यात आणण्यात आलेल्या अनैतिक मानवी तस्करीच्या १५८ प्रकरणात अर्ज संस्थेने यशस्वी हस्तक्षेप केला, यातील बरीच प्रकरणे ही ग्रामीण भागातील आहेत. तस्करी करणारी व्यक्ती ही अनेकदा परिचयाचीच असते, त्यामुळे स्थानिक पोलीस गुन्हा नोंदवत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
परिसंवादात बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर म्हणाले, की तस्करी करणारे संघटित गुन्हेगार देह व्यापारास नकार देणाऱ्या महिला, मुलींवर अमानवी अत्याचार करतात. त्यामुळे मुली व महिलांची अवस्था पशुवत होते. त्यांना जबरदस्तीने व्यसने लावली जातात. त्यामुळे देह व्यापाऱ्यातून बाहेर पडण्याची मार्ग बंद होतात. मानसोपचार व समुपदेशन यांचा प्रभावी वापर करून अशा महिलांचे कौटुंबिक पुनर्वसन शक्य आहे. बळींना रोजगार शिक्षण देऊन पायावर उभे केले जाऊ शकते, यासाठी त्यांनी विविध उदाहरणे दिली.
परिसंवादात बालकल्याण समितीचे सदस्य तुषार कवडे, ॲड. अनुराधा येवले, रोहिणी कोळपकर, जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी श्रीकांत मरकड, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, स्नेहालय संस्थेच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे आदींनी सहभाग घेतला. स्नेहाधार प्रकल्पाचे मानद संचालक ॲड. शाम असावा यांनी अनैतिक मानवी तस्करी व संस्थात्मक उपाययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी विद्या घोरपडे, रूपाली सोयम, अमर पाटील, सिद्धार्थ दाभाडे, कावेरी रोहकले, मंदाकिनी मोकळे, मनीषा शिंदे, प्रतीक्षा अंभोरे आदींनी परिश्रम घेतले.
उपायोजनांचे मार्गदर्शन
मोबाईल, विविध डेटिंग साइट्स व समाज माध्यमांचा वापर करून मुलींची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येते. हे रोखण्याबाबत सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी करावयाच्या उपायोजनांबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.