अलिबाग- खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत त्यांना आणि विधानसभा निवडणूकीत गोगावले यांना पडलेल्या मतांचा हिशोब मांडला होता. दोघांमधील पडलेल्या मताधिक्यावरून गोगावले यांना प्रश्न विचारले होते. या टीकेला रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले गोगावले यांनी उत्तर दिले आहे. तटकरेंचा हिशोब चुकतो आहे. त्यांनी जुन्या पध्दतीने अभ्यास करावा असा खोचक सल्ला त्यांनी दिला. ते लोणेरे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
तटकरे यांना लोकसभा निवडणूकीत महाड मतदारसंघातून तीन हजारांचे मताधिक्य मिळाले, विधानसभा निवडणूकीत मला जास्त मताधिक्य मिळाले ही वस्तुस्थिती आहे. पण लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती आणि विधानसभा निवडणूकीतील परिस्थिती वेगळी होती. लोकसभा निवडणुकीत तटकरेंना मुस्लिम समाजाची मते मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांचे मताधिक्य घटले. आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत तटकरेंना ३० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तर विधानसभा निवडणूकीत आदिती तटकरे ८० हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. मग लोकसभा निवडणुकीत त्यांनी काम केले नाही असे म्हणणार का असा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला. लोकसभा आणि विधानसभेची राजकीय परिस्थिती आणि गणित वेगळी असतात असेही गोगावले म्हणाले.
मी कधीही चुकीचे आरोप केले नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावांतील आम्ही मते तपासली त्यावेळी आम्हाला अतिशय कमी मते मिळाली, त्यांच्या काही गावत मतदानच कमी झाले. त्या उलट लोकसभा निवडणुकीत या गावात भरभरून मतदान झाले होते. त्यांनी तळोश्रीच्या रंगोदेवीच्या मंदीरात यावे तिथे मी देवी समोरचे फूल उचलून सत्य बोलण्यास तयार आहे. खोटे बोलेलो तर माझे नुकसान होईल असे आव्हान गोगावले यांनी तटकरे यांना दिले.
माझ्या नॅपकीनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही…
मला नॅपकीन वापरायची सवय झाली आहे. तो मी काखेत ठेवतो, खांद्यावर ठेवत नाही. माझ्या नॅपकीन मध्ये गोरगरीबांचे आशिर्वाद आहेत. तटकरेंना नॅपकीन कसा वापरायचा हे शिकायचे असेल तर प्रशिक्षण देऊ. तटकरे येवढे नकलाकार आहेत हे माहित नव्हते. पाऊस कमी झाला की त्यांचा एखादा कार्यक्रम लाऊ अशी खोचक टीप्पणी त्यांनी केली.