आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी भाजपने महाविजय- २०२४ अभियान शनिवारी जाहीर केले. राष्ट्रवाद आणि विकासाच्या मूलमंत्राने विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समाजमाध्यमांवर सक्रिय होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपाच्या या अभियानावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

“महाविजय २०२४” संकल्पातून स्पष्टपणे दिसून येते की भाजपाच्या दृष्टिने शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याशी युती होणार नाही व विलीनीकरण होऊ शकते. असो, महाराष्ट्रातून भाजपची हकालपट्टी अपरिहार्य आहे हे हल्लीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होते. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक निकालाचा संदर्भ जोडल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

नाशिकच्या सातपूर येथील डेमोक्रसी हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरम् बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, मुंबईचे अध्यक्ष आ. आशीष शेलार आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा शनिवारी सायंकाळी समारोप झाला. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी मुख्य मुद्दा लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी रणनीती हाच राहिला.

हेही वाचा – “आता नंबर कुणाचा?” अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊतांचा उल्लेख करत किरीट सोमय्यांचं सूचक विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघनिहाय पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे जाहीर केले. कार्यकारिणीच्या समारोप सत्रात फडणवीस यांनी महाविजय अभियानाची घोषणा केली. महाविकास आघाडीने अडीच वर्ष वाया घालवली. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपला अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम करायचे आहे, असे ते म्हणाले. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या घटनाबाह्य सरकारच्या आरोपाबाबतही त्यांनी भाष्य केले. ‘‘उरलेसुरलेले लोक पक्षांतर करू नये, म्हणून त्यांना तसे बोलावे लागते. राज्यात स्थापन झालेले सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. न्यायालयाचा निकालही आपल्या बाजूने येणार आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून नव्याने दीडपट जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल’’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.