कराड : स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या व प्रतिसरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ज्यांना बहीण मानले होते अशा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई वसंतराव आंबेकर (९६) यांचे आज सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत सातारा पवई नाका येथील आंबेकर निवास येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता अंत्ययात्रा निघेल.

ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांच्या त्या मातोश्री असून पत्रकार सुजित आंबेकर यांच्या त्या आजी होत. श्रीमती कमलाबाई आंबेकर यांच्या मागे चार मुलगे, चार विवाहित मुली, सुना, जावई , नातवंडे, पतवंडे , नात सुना असा मोठा परिवार आहे. श्रीमती कमलाबाई आंबेकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील हे भूमिगत असताना तसेच इतरही स्वातंत्र्यसैनिक भूमिगत असताना त्यांच्या राहण्याची सोय व जेवणाची सोय पोवई नाक्यावरील आंबेकर निवास येथे केली होती. अनेक स्वातंत्र्य सैनिक या घरात व तळघरात राहून गेल्याची आठवण श्रीमती कमलाबाई आंबेकर नेहमी सांगत असत.

हेही वाचा : मनोज जरांगेंना १४ राज्यांचं पाठबळ? सरकारला इशारा देत म्हणाले, “मराठे मुंबईत जातात की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मवीर भाऊराव पाटील , स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब कळके , कॉम्रेड शेख काका उर्फ शेख बंडू इनामदार , क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड, क्रांतिवीर कॉम्रेड बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर, राजमती पाटील, तुफान सेनेचे कॅप्टन राम लाड, कॉम्रेड व्ही. एन. पाटील , रामजी पाटील, दत्तोबा वाकळे, कॉम्रेड नारायणराव माने, सोपानराव घोरपडे, बाबुराव जंगम असे अनेक क्रांतिकारक व बिळाशी येथील सत्याग्रहात भाग घेतलेले अनेक क्रांतिवीर आंबेकरांच्या निवासस्थानी येत असत. स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक आठवणी श्रीमती कमलाबाई आंबेकर या नेहमीच सांगत असत. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास व संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जिवंत अनुभवलेल्या श्रीमती कमलाबाई आंबेकर यांच्या निधनाने त्या काळचा चालता बोलता इतिहास अन् देशभक्त माता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.