सोलापूर : आगामी काळात येणारे सण, उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आणि सामाजिक अस्थिरता व जातीय संघर्ष झाल्यास त्यावर झपाट्याने कारवाई होण्याकरिता सोलापूर ग्रामीण भागात केंद्रीय राखीव पोलिसांच्या अतिजलद कृती दलाच्या पथकाने काही गावांमध्ये पथसंचलन केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे झालेल्या या पथसंचलनात सिकंदराबाद येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक ए. सरस्वती व त्यांच्या सहकाऱ्यांसह सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सुधीर टेकाळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक फैयाज बागवान आदींनी सहभाग घेतला होता.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन झाले. या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेची हमी देण्यात आली. येणाऱ्या काळात विविध सण आणि उत्सवांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या तुकड्यांकरवी पथसंचालन केले जात आहे.
अक्कलकोट शहर व ग्रामीण भागात अलिकडे सामाजिक शांतता सुव्यवस्था राखणे ही जोखिमाचा मुद्दा ठरला आहे. विशेषत: मैदर्गी शहरासह अक्कलकोट शहरात राजकारणातून सामाजिक तणाव वाढला आहे. त्यादृष्टीने तेथेही पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
आगामी काळात येणारे सण, उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आणि सामाजिक अस्थिरता व जातीय संघर्ष झाल्यास त्यावर झपाट्याने कारवाई होण्याकरिता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये हे पथसंचलन केले.