राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधली सगळी व्यक्तिमत्वं सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली होती. या टीकेवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता “चंद्रकांत पाटील हे झोपेतही राष्ट्रवादीच नाव घेतात त्यांचे बोलणे तुम्ही मनावर का घेता”, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच २८ टक्के महागाई भत्त्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले. महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. मात्र कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. कृती समिती शासनासोबत डील करतं असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई पोहोचले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपामध्ये सलगी करत आहेत असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधली सगळी व्यक्तिमत्वं सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात”.

“राष्ट्रवादीने सलगी करणं यासाठी भाजपा कधीही भुलणार नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत सलगी करण्याच्या त्यांच्या डावाला फसणार नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.