कराड : ‘ज्ञानविना माणूस अपूर्ण’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून कराडशेजारील मलकापूरच्या श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज येथे पाचशे विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे भव्य बोधचिन्ह साकारले. सण, उत्सव, युगपुरुषांची जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय दिन यानिमित्त असे अनेक उपक्रम हे संस्था व महाविद्यालयांकडून राबवले जातात.

तब्बल पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागातून मानवी साखळी उभी करून साक्षरता दिनाचे बोधचिन्ह प्रत्यक्ष साकार करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना विद्यालयाचे चित्रकला शिक्षक जगन्नाथ कराळे व राजेंद्र पांढरपट्टे यांची होती. मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही भव्य प्रतिकृती साकारून समाजाला साक्षरतेचा संदेश दिला आहे.

याप्रसंगी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात म्हणाले, की सर्वत्र आजही निरक्षरतेचे प्रमाण काही ठिकाणी जाणवते. ते दूर करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमधून अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचवून खरोखरच प्रशंसनीय कार्य केले आहे.

जगभरात दरवर्षी ८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा केला जातो. साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे, शिक्षणाचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचवणे व समाजातील प्रत्येक व्यक्ती साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारलेले हे बोधचिन्ह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली असल्याबद्दल अशोकराव थोरात यांनी समाधान व्यक्त केले.