कोल्हापूर : येथील राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालयात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समोरच दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झडला. अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये यावरून चांगलाच गोंधळ उडाल्याने आरोग्यमंत्र्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या समजावून सांगितल्यानंतर वादावर पडदा टाकला.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आज राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालयास अचानक भेट दिली. कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, येथे मंजुरीपेक्षाही कमी प्रमाणात रुग्ण खाट सुविधा असल्याचे दिसून आले. त्यावरून आबिटकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यातून या दोन अधिकाऱ्यातील वाद झाला.
कोल्हापूर हद्दवाढ होणारच
दरम्यान पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर शहरासाठी आता हद्दवाढ आवश्यक आहे. सर्वांना, संबंधित गावांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असून मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत. पुण्यासारख्या शहराची अनेकदा हद्दवाढ झालेली आहे. हद्दवाढीशिवाय शहराच्या विकासाला गती येत नाही. शहराभोवतीचा परिसर विकसित होणे हा निसर्गाचा नियम आहे.