‘आम्हाला गावाकडे जावू द्या,  यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करा’, अशी मागणी करत इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भागात असणार्‍या शेकडो परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर रास्ता रोको आंदोलन केले.  या आंदोलकांनी तासभर इचलकरंजी – सांगली मार्ग रोखून धरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना साथीमुळे टाळेबंदी सुरु असल्याने उद्योग बंद आहेत. गेली दोन महिने काम नसल्यामुळे कामगार हतबल झाले आहेत. वेतन नाही, वाढता खर्च, गावाकडील परिवाराची चिंता या कोंडीत अडकलेले हजारो कामगार गावाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाबरोबरच शहरालगत असलेल्या पार्वती औद्योगिक वसाहत, लक्ष्मी औद्योगिक वसाहत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. प्रशासनाकडे अर्ज करूनही जाण्यासाठी परवानगीच मिळत नसल्याने काही युवकांनी सायकलीने उत्तर प्रदेशला जाण्याचा प्रयत्न केला. आठवडाभरात तीनवेळा अशा युवकांना ताब्यात घेऊन पुन्हा परत पाठवण्यात आले. शहरात सुरू केलेल्या केंद्रात तब्बल ७ हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या प्रांतात जाण्यासाठी अर्ज केले आहेत.

इचलकरंजीलगत असलेल्या शिरोळ तालुक्यातील पार्वती औद्योगिक वसाहत या ठिकाणी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. आज या कामगारांची सहनशीलतेचा कडेलोट झाला. पाचशेहून अधिक परप्रांतीय कामगारांनी एकत्र येऊन आज गजानन महाराज मंदिरसमोर आंदोलन करत रस्ता रोखून धरला.

याची माहिती मिळताच, शहापूरचे पोलिस निरीक्षक प्रकाश निकम यांनी या कामगारांना बाजुच्या मोकळ्या जागेत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगारांचा रोष अधिकच वाढला. घटनास्थळी आमदार प्रकाश आवाडे,,पोलिस उपाधिक्षक गणेश बिरादार, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, यांनी कामगारांची समजूत काढली. कामगारांना मुळ गावी पाठविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur block the way from migrant workers msr
First published on: 12-05-2020 at 19:27 IST