अलिबाग – कोकणात दरड प्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या पहाणीनंतर ही बाब समोर आली असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिध्द केली आहे. रायगड मधील ३९२, रत्नागिरी मधील १८१ तर सिंधुदुर्ग मधील ६३ गावांचा यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरडप्रवण गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात या गावांना सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षीपर्यंत १८३ दरडप्रवण गावे होती. मात्र इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील ८४ जणांच्या मृत्यूनंतर डोंगर माथ्यांवरील दरडप्रवण गावांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर दरड प्रवण गावांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण गावांची संख्या १८३ वरून ३९२ वर गेली आहे. यात पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश आहे. ज्यातील ७१ गावे ही अतिधोकादायक दरडप्रवण गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
रायगड जिल्ह्यात यापुर्वी दरड दुर्घटनांच्या ११ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात जुई, दासगाव, रोहण, कोंडीवते. कोतवाल, केवनाळे, साखर सुतारवाडी, तळीये आणि इरशाळवाडी येथील घटनांचा समावेश आहे. २००५, २०२१,२०२३ मध्ये मोठ्या दरड दुर्घटना घडल्या जात मोठी जिवित आणी वित्त हानी झाली. या घटनांची गंभीर दखल घेऊन भूवैज्ञानिकांकडून संभाव्य दरड प्रवण गावांचे फेर सर्वेक्षण करण्यात आले ज्यात कोकणातील तीनही जिल्ह्यात दरडप्रवण गावांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दरडप्रवण गावांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिओलॉजीकल सर्वे ऑफ इंडीयाच्या भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील दरडप्रवण गावांची संख्या ४३ ने वाढली आहे. पूर्वी जिल्ह्यात केवळ २० दरडप्रवण गावे होती. ती वाढून आता ६३ झाली आहे. तर रत्नागिरी मध्ये १८१ दरडप्रवण गावे असल्याचा निष्कर्ष भूवैज्ञानिकांनी काढला आहे.
दरडी कोसळण्याची नैसर्गिक कारणे
कोकणात प्रदेश हा प्रामुख्याने पर्वतमय आहे. या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. खडकांची रचना दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरते. या शिवाय हा परिसर भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो त्यामुळे दरडीचा धोका जास्त संभावतो. कोकणातील बहुतांश रस्ते हे घाट माथ्यावरून जातात. या रस्त्यांसाठी ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातात. कालांतराने या परीसरात सैल झालेले डोंगर, दगड गोटे कोसळण्यास सुरवात होते. त्यामुळे कोकणात रस्ते रेल्वे मार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. कमी वेळात जास्त पाऊस झाला तर दरड प्रवण गावांना धोका संभावतो.
दरड प्रवण गावात उपाय योजना
दरड प्रवण गावांचे पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातील अतिधोकादायक गावात ‘पीए सिस्टम’ म्हणजे सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी २१ ठिकाणी हवामान विषयक पूर्व सूचना देण्यात येतील. लाईव्ह अथवा रेकॉर्डेड संदेश देता येईल. या ठिकाणी सायरन वाजविला जाणार आहे. – सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डोंगर पोखरले गेले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील गावांना दरडींचा धोका निर्माण झाला आहे. विकास प्रकल्पांचे काही प्रमाणात हे दुष्परीणाम म्हणता येतील, दुसरीकडे इरशाळवाडी, तळीये सारख्या घटनानंतर यंत्रणा दरडींच्या आपत्तीच्या बाबतीत अधिक सजग झाल्या, त्यामुळे डोंगर माथ्यांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक गावांचा शोध घेतला गेला. त्यामुळे दरड प्रवण गावांची संख्या वाढली. – प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई, भुगर्भशास्त्र विषयाचे तज्ञ, रत्नागिरी.