कुकडीचे आवर्तन सुटले आहे, मात्र यामध्ये पाणी पिण्यासाठी की शेतीला, शिवाय ते ‘टेल टू हेड’ की ‘हेड टू टेल’ याचा नेमका उल्लेख नसल्याने या आवर्तनात प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्याचा मोठा फटका कर्जत तालुक्यास बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अनेक तलाव कोरडे राहण्याची शक्यता आहे.
कुकडीचे आवर्तन सुटून १५ दिवस झाले असले तरी, अद्याप जामखेड तालुक्यातील चौंडी येथेच पाणी पोहचलेले नाही. शहराला पाणीपुरवठा करणारा थेरवडी तलावही अवघा २५ टक्के भरला आहे. हे पाणी कसेबसे महिनाभर पुरेल. त्यानंतर पाण्यासाठी कर्जकरांना पुन्हा वणवण करावी लागेल, अशीच शक्यता आता दिसू लागली आहे. दूरगाव व सीना धरणातही अद्यापि हे पाणी पोहोचले नाही. अन्य अनेक चा-याही कोरडय़ाच राहिल्या आहेत.
तालुक्यातील शेतक-यांना उन्हाळी आवर्तनातदेखील असाच वाईट अनुभव आला होता. त्या वेळीदेखील थेरवडी, दूरगाव, सीना हे तलाव पूर्ण भरले नव्हते. त्या वेळी खरिपाचे आवर्तन शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. शेवटच्या टोकाकडील करमाळा (सोलापूर)-जामखेड-कर्जत या क्रमाने आवर्तन करणे गरजेचे असताना त्याआधीच श्रोगोंदे तालुक्यात कालवा फोडून आवर्तन वळवण्यात आले. पूर्ण झाल्यावर मग श्रीगोंदे तालुक्याचे आवर्तन असताना त्यांनी मध्येच कालवा फोडून पाणी घेतले त्यामुळे कर्जत व इतर तालुक्यांचे पाणी कमी झाले आहे. एकूणच कुकडीच्या आवर्तनात कर्जत तालुक्यातील नियोजन पूर्ण कोलमडले असून त्याचा विपरीत परिणाम नजीकच्या काळात जाणवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकर्जतKarjat
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kukadi rotation planning tumbled
First published on: 29-08-2015 at 04:00 IST