CM Devendra Fadnavis on Lawrence Bishnoi Poster: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आले होते. या प्रकराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलत असताना याबाबतचा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून पडळकर यांनी पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले आहे. या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकवले त्यांच्यावर कारवाई होईलच.”
महापालिका निवडणुका वेळेतच होणार

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या मुदतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पावसाचा जोर असेल त्या भागात निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करू. याबाबत सरकार आणि निवडणूक आयोग योग्य तो समन्वय राखेल. पण वेळेत निवडणुका पूर्ण झाल्याच पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे.

महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ

“महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जिथे तुल्यबळ स्पर्धक असतील तिथे अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता आम्ही चांगली स्पर्धा करू. कार्यकर्ते अनेक वर्ष प्रभागात काम करतात, त्यांना संधी द्यायला हवी. निवडणूकपूर्व वेगळी लढत झाली तरी निवडणुकीनंतर निश्चितच युती होईल”, असेही ते यावेळी म्हणाले.

तुर्कियेच्या मालावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापारांना सलाम

पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर चित्रपट सृष्टी आणि महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी पाकिस्तान, तुर्किये आणि अझरबैजानशी व्यापार करण्यावर बहिष्कार घातला आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. राष्ट्र प्रथम ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे. पहलगाममध्ये आपल्या लोकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारले गेले. अशी क्रूरता करणारा देश आणि त्याला साथ देणाऱ्या देशांनाही धडा शिकविण्याची गरज आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “लोकांनी जर स्वतःहून राष्ट्र प्रथम ही भावना नजरेसमोर ठेवून काही कृती केली असेल तर मी त्यांचे स्वागत करतो.” याबरोबरच तुर्कियेशी व्यापार तोडल्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकी मिळाली आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता फडणवीस म्हणाले की, तुर्कियेच्या मालावर ज्यांनी बहिष्कार टाकला, त्या व्यापाऱ्यांचे अभिनंदन. पहलगामवरील हल्ला फक्त भारतावरच नाही तर तो मानवतेवर झालेला मोठा हल्ला होता. मानवतेच्या हल्लेखोरांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास प्राप्त आहेत. त्यांना काळजी करण्याची गरज नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उध्वस्त करणारा आपला देश आहे. आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाईट इमेजसहीत पाकिस्तानचे सत्य बाहेर काढले आहे. ते भारताला नखही लावू शकले नाहीत. पण आम्ही पाकिस्तानला कसे उध्वस्त केले, हे जगासमोर आले आहे. सर्वांना आम्ही संरक्षण देऊ.