संगमनेर : शहरात वीजपुरवठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने अनियमित, खंडित होणारा वीजपुरवठा, दिवसभरात अनेकदा अचानक वीज जाण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करा, या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आज, शुक्रवारी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनात माजी नगरसेवक अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, संतोष मुर्तडक, जावेद पठाण, सुषमा भालेराव, वैशाली बर्गे, मंगल साळुंखे, जीवन पंचारिया, पूजा पावसे, सुवर्णा शिंदे, संजय कानवडे, सादिक तांबोळी, महेश सानप आदी सहभागी होते.
यावेळी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले की, अनियमित वीज पुरवठा, कमी किंवा जास्त दाबाची समस्या, तुटलेल्या तारा व रहदारीच्या ठिकाणी विजवाहक तारांना पडलेला झोळ, नागरिकांच्या घराजवळून गेलेल्या वीजवाहक तारांना संरक्षण कवच नसल्याने जीवित व मनुष्यहानी होण्याची शक्यता, खांब दुरुस्तीची रखडलेली कामे या समस्यांमुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहणे हे चिंताजनक आहे. तक्रार देऊनही दखल घेतली जात नाही. आठ दिवसांत या समस्यांचे निराकरण करावे. संगमनेर विभागासाठी एक स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
तातडीने मार्ग काढा
मागील सहा महिन्यांपासून विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरण याकडे लक्ष देत नाही. सध्या वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विचारणा केल्यास याबाबत उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देतात. यावर तातडीने मार्ग काढा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल. दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष