सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊन चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. तसेच या चमत्काराच्या दाव्यावर आक्षेप घेत हा दावा करण्यांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जगात चमत्कार घडत नाहीत, तर प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असते, असंही अंनिसने नमूद केलं. याबाबत सांगली महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस.के. माने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र अंनिसने म्हटलं, “सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली या गावात जाधव नावाच्या व्यक्तीच्या घरातील गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू (पाणी) येत आहे आणि हा चमत्कार आहे, असा दावा करण्यात येत आहे. सद्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू असल्याने चमत्काराचा दावा करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे असा खोटा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करा.”

“जाधव यांनी चमत्कार तपासण्याची परवानगी द्यावी”

“सध्याच्या विज्ञान युगात असे चमत्कार घडू शकत नाहीत. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते, ते कारण मानवी बुद्धीला समजते. जाधव यांनी चमत्कार तपासणी करण्याची परवानगी दिली, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चमत्कारामागील कारण-विज्ञान लोकांना सांगू शकेल. जाधव यांना अंनिसचे आवाहन आहे की, कृपया चमत्काराची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीस सहकार्य करावे,” असं आवाहन अंनिसने केलं.

व्हिडीओ पाहा :

“चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे दखलपात्र गुन्हा”

अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले, “गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. या कायद्याच्या कलम दोननुसार ‘एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, त्यांच्यावर दहशत बसविणे’ हा दखलपात्र गुन्हा आहे.”

“पोलिसांनी चमत्काराची सत्यता पडताळून पहावी”

“या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार त्या भागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे या कायद्याचे ‘दक्षता अधिकारी’ म्हणून काम करत असतात. या दक्षता अधिकाऱ्यांनी संबंधित चमत्काराची सत्यता पडताळून पहावी, तथाकथित चमत्कार घडवून दिशाभूल केली असल्यास संबंधितावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

“संतांनी, समाजसुधारकांनी चमत्कारांच्या घटनांना विरोध केला”

“महाराष्ट्रातील संतांनी, समाजसुधारकांनी चमत्कारांच्या घटनांना विरोध केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात, चमत्काराच्या भरी भरोनी । अनेकांची झाली धुळधानी । संत चमत्कार यापुढे । नका वर्णवू सज्जनहो ।। तेव्हा बुद्धीच्या देवतेच्या नावाने अशा चमत्कारांची अफवा पसरवणे हा त्या देवतांचा अपमानच नव्हे काय?” असा सवालही अंनिसने केला आहे.

हेही वाचा : “कुंडली पाहून संघ निवडीसाठी ज्योतिषाला दिलेल्या १५ लाख रुपयांची…”; अंनिस आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चमत्कार दाखवून जनतेची दिशाभूल करणे अत्यंत निषेधार्ह”

“पुरोगामी विज्ञानवादी महाराष्ट्रात असे कथित चमत्कार दाखवून जनतेची दिशाभूल करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा तथाकथित चमत्कारावर जनतेने विश्वास ठेवू नये,” असे आवाहन अंनिसने नागरिकांना केले.