महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना केलेल्या हाणामारीमध्यअनेकजण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूकडील जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत पाळण्याचे आवाहन करत होते. तर भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून बंद संदर्भात शहरभरामध्ये वेगवेगळा प्रचार केला जात असतानाच दोन्ही बाजूकडील पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने हाणामारी झाली.

कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूकडील अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. आम्ही शांततेमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं सांगत असताना भाजपाचे लोक तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने वाद झाल्याचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर भाजपाचे शहराध्यक्ष सुनील महाडीक यांनी आम्ही व्यापाऱ्यांना दुकान बंद करु नका असं सांगत शहरामध्ये फिरत असताना अचानक जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचा दावा केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. मात्र या बंदला भाजपाने विरोध केला आहे. “शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिलं आहे. “लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.