राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अद्याप खरी शिवसेना कोण? यासंबंधी निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकांवर निर्णय प्रलंबित असून, निवडणूक आयोगानेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर सतत टीका आणि आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला अनेकदा प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार का? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं आहे.

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांना भविष्यात उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “आज आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत, तिथे बाळासाहेबांचे विचार, राज्याचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष आहे. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथे लोकांच्या चेहऱ्यावर वेगळं पहायला मिळत आहे. याचा अर्थ त्यांनी सरकारला मान्यता दिली आहे. लहान मुलं, राजकारणाशी संबंध नसणारे तुमचं पाऊल राज्याच्या हिताचं आहे असं सांगतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यापेक्षा, कामातून उत्तर देऊ हा माझा स्वभाव आहे”.

राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलावणार का?

दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलावणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “जेव्हा हे सरकार स्थापन होत होतं, तेव्हाही अनेक चर्चा होत होत्या. काही बातम्या आल्या की अनेक लोकांच्या पोटात गोळा यायचा. हीदेखील चर्चा आहे. अजून गणपती विसर्जन झालेलं नाही, त्यानंतर पितृ पंधरवडा, नवरात्री आणि नंतर दसरा आहे. सगळं आताच कसं काय सांगणार? त्याला फार अवधी आहे. मधल्या काळात अनेक गोष्टी होत असतात”.

बंडखोरी करण्याचा विचार मनात कसा आला?

आता बंडखोरी केली पाहिजे, हा विचार मनात कधी आणि कसा आला? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणं आम्हाला आधीपासून मान्य नव्हतं. सेनेच्या आमदारांनाही मान्य नव्हतं, जनतेलाही मान्य नव्हतं. आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यावेळी नेतृत्वाचा निर्णय झाला, आम्ही एकत्र काम करू लागलो. पण तेव्हाही आमदारांची याला मान्यता नव्हती.”

“आम्ही त्याच ठिकाणी जातो, जिथे कॅमेरे…” एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना खोचक टोला!

“सुरुवातीपासूनच आमचा याला विरोध होता. शिवसेनेला त्रास होत होता, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जात होतं. मविआ सरकारमधील काही घटक पक्षातील नेते आमच्याच आमदारांच्या मतदारसंघात जाऊन भूमीपूजन आणि उद्घाटनं करत होते. जो उमेदवार पराभूत झालाय, त्याला हाताशी धरून हे सर्व सुरू होतं. शिवसेनेची गळचेपी होत होती. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यांचीही सरमिसळ होत होती, यातूनच हा निर्णय झाला” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा कुठला पॉइंट होता का? जिथे तुम्हाला वाटलं आता डोक्यावरून पाणी जातंय, आता नाही राहायचं? असा कोणता मुद्दा ट्रिगर झाला? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “एकदा ट्रिगर दाबला नव्हता, ट्रिगर दररोज दाबला जात होता. ट्रिगर दाबल्यावर जी गोळी सुटते, त्यात दररोज कुणी ना कुणी शहीद व्हायचा. यात शहीद झालेले ५० लोकं माझ्यामागे लागले होते, तुम्ही बंडखोरी करा, नाहीतर आम्ही करू….”