अलीकडेच केंद्र सरकारने एलआयसीमधील हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. एलआयसीमधील फक्त ५ टक्के हिश्शाची विक्री केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यावरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या देशात खासगीकरणाची खाज वाढू लागली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. देशात एकेक आव्हानं आणि नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. आज जे समोर चित्र दिसतेय, ते म्हणजे खासगीकरणाची खाज वाढू लागली आहे. कुठे कुठे खाजवणार आणि काय काय खासगी करणार याची कल्पना नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाचा समाचार घेतला आहे. भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एलआयसीचंही खासगीकरण सुरू झालं आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, दीप म्हटलं की उजेड पडतो. पण इकडे भवितव्यच अंधारात जात असेल, तर मग आपल्या संघटनेचं काम महत्त्वाचं असतं. जरी कुणी दुसर्या संघटनेचे असले तरी ते आपलेच आहेत म्हणून त्यांच्यासाठी न्याय हक्काची लढाई लढली गेलीच पाहिजे. ज्या ज्या वेळी तुमच्यावर कोणी वार करेल, त्या-त्या वेळी त्या वाराचा मुकाबला करण्याची हिंमत आपल्या भगव्यात आहे, हे तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.