Mumbai Marathi News Live Updates : महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अशातच काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भूषण सोहळ्यात कितीजण मृत्यूमुखी पडले? त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला की चेंगराचेंगरीत? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारले. तसेच त्यांनी एक व्हिडीओसुद्धा ट्वीट केला. दरम्यान, यावरून आज पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. मात्र, आता बहुतांश भागात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांच्यावर गेलं आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील इतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्यांवर आपलं लक्ष असेल.