Maharashtra Political Crisis Updates, 22July 2022 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा शाब्दिक संघर्ष या विषयावरुन आजही पहायला मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात आता आरपारची लढाई केली जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं असून या विषयावरुन आज आरोप प्रत्यारोप केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेल्या आणखीन एका प्रकरणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची चिन्हं आज दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर ईडीने टाच आणली आहे. दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’ तपास करत असून पटेल यांच्याविरोधातील कारवाईवरुनही आज राजकारण तापण्याची शक्यता आहे. गेली दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली साजऱ्या होणाऱ्या सणोत्सवांवरील सर्व निर्बंध हटविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केल्यानंतर सध्या सरकारच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलं जात आहे. दहिहंडी, गणशोत्सव, मोहरमवर कोणतेही अवास्तव निर्बंध लागू करू नका, नियमांचा बाऊ करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला असून देशभरामध्ये यासंदर्भातील जल्लोष पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या विजयाच्या दुसऱ्या दिवशीही आनंद साजरा केला जात आहे. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी.