राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष लागलं असताना साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही सुरु आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्याने साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, येथे मतमोजणीला सुरूवात होताच उदयनराजे पिछाडीवर पडल्याचे धक्कादायक अपडेट्स आलेत. पिछाडीचे अपडेट्स येताच उदयनराजे भावुक झालेले पाहायला मिळाले. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार उदयनराजे हे जवळपास 94 हजार मतांनी पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना उदयनराजे भावुक झालेले पाहायला मिळाले. “लोकशाहीत समाज हाच राजा असतो. त्यांनी जो कौल दिला, तो मी स्वीकारतो”, असं उदयनराजे म्हणाले. पुढे बोलताना,”आजपर्यंत ज्यांना केंद्रबिंदू मानून (शरद पवार) काम केलं, त्यांनी सांगितली तिच पूर्वदिशा मानली. मी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर जास्तीत जास्त काय होणार, मी पराभूत होईल… मी जिंकून नाय येत तर पराभव होणार…ते मला मान्य आहे. पण माझं वैयक्तिक जीवनही आहे,मी २०-३०-२५ वर्षे समाजकारणात घालवली, निस्वार्थीपणे लोकांसाठी काम केलं. मात्र, याच्यापुढे गप्प बसणार, आणखी काय करु करतो”, अशी खंत यावेळी उदयराजे यांनी व्यक्त केली. याशिवाय “एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील पाच वर्षे येथील विकास थांबेल.”असं देखील उदयनराजेंनी म्हटलं.

मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलांनुसार, उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.