सोलापूर : सुरुवातीला दोन नक्षत्र कोरडीच गेल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राने चांगली साथ दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यातील सर्व सहा मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापि अपुरा पाणीसाठा आहे. लघुपाटबंधारे तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांयांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. मागील १५ दिवसांत पुण्याच्या पश्चिम घाट परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात उणे १२.४८ टक्क्यांवरून उपयुक्त स्वरूपात असा ५६.९५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा मृत स्वरूपात म्हणजे उणे १२.४८ टक्के इतका खालावला होता. परंतु त्यानंतर भीमा खोऱ्यात सातत्याने दमदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे. मागील १५ दिवसांत धरणात उणे १२.४८ टक्क्यांवरून उपयुक्त स्वरूपात ५६.९५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा २६६६.७७ दललक्ष घनमीटर म्हणजे ९४.१७ टीएमसी एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ८६३.९६ दलघमी म्हणजे ३०.५१ टीएमसी इतका आहे. धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत आहे. पुण्याच्या बंडगार्डन व दौंडमार्गे उजनी धरणात २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, जिल्ह्यातील पाऊसमान गतवर्षांच्या तुलनेने सध्या कमीच आहे. त्यामुळे सर्व मध्यम प्रकल्पांसह लघुपाटबंधारे तलाव आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.