Manoj Jarange बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. दरम्यान न्याय मिळावा म्हणून मस्साजोगचे गावकरी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. यावेळी मनोज जरांगेंनी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर आता देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही धनंजय देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाच्या बरोबर आहोत. धनंजय देशमुख यांनी आत्महत्या करु नये ही विनंती करायला मी त्यांना इथे आलो आहे. सरपंचाची हत्या होते, त्यानंतर न्याय मिळावा म्हणून जर सरपंचाच्या भावाला आत्महत्या करतो हे म्हणायची वेळ येत असेल तर ही बाब दुर्दैवी आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे-मनोज जरांगे

एखाद्या आंदोलनात आत्महत्या हा विषय आला की पायाखालची जमीन सरकते. आपल्याला संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना सांगणं आहे की या कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आहेत त्यांना सांभाळू नका, देशमुख कुटुंबाला सांभाळा. कुणालाही सोडणार नाही हा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घ्यावी आणि कुणालाही सोडू नये. तपास यंत्रणांचे हात बांधले गेले आहेत का? अशी शंका येण्यास जागा आहे. आज देशमुख कुटुंबाला संपूर्ण माहिती काय काय झालं ते सांगितलं पाहिजे.

हे पण वाचा- Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?

खंडणीमुळेच हत्या झाली आहे-मनोज जरांगे

खंडणीतले जे आरोपी आहेत त्याबाबत एकच सांगणं आहे की खंडणीमुळेच हत्या झाली आहे. सामान्य शेतकऱ्यांनाही हा विषय कळतो तर तुम्ही तर अनुभवी मुख्यमंत्री आहात. खंडणीमुळेच हत्या झाली आहे. खंडणीतल्या आरोपीला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाहीतर काय करणार? खंडणीमुळे खून झाला आहे, त्या आरोपीला ३०२ मध्ये घ्या अशीही मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या प्रकरणात चुकीचं पाऊल पडलं आहे त्यामुळे आम्हाला आता यात उतरावं लागतं आहे. अजून पोलिसांना फेकलेला मोबाइल कसा सापडत नाही? त्या मोबाइलमध्ये बरेच पुरावे आहेत असंही कळलं आहे. अनेक लोक त्यात गुंतणार आहेत असं दिसतंय. खंडणीतला जो आरोपी वाचवू पाहात आहात, खंडणीतला आरोपी तुमचं सरकार चालवतो आहे का? असा प्रश्न मनोज जरांगेंनी विचारला. खंडणीतला आरोपी मोदींपेक्षा मोठा आहे का? कुठलं राजकारण, कुठलं सरकार तुम्ही चालवत आहात? असेही प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थित केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमचा संयम सुटत चालला आहे-मनोज जरांगे

आमचा संयम सुटत चालला आहे कारण धनंजय देशमुख आत्महत्या करायची असं म्हणत आहेत. त्यामुळे आमचे शब्दही त्याच पद्धतीने बाहेर पडणार. देशमुख कुटुंबाला जर धक्का लागला नाही, तर आम्हालाही मराठे म्हणतात हे ध्यानात ठेवा. चुकीच्या दिशेने तपास केला आणि देशमुख कुटुंबातल्या एकालाही काही झालं आणि जर तो आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करेन. असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.