मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये टिकणारं आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी स्पष्ट मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ते जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीरसभेत बोलत होते.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण संबंधित आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्याची मागणी करणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

हेही वाचा- “छगन भुजबळ अन् एकनाथ शिंदे एकाच बाजारातले, त्यांच्याविषयी…”, मराठा आरक्षणावर जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, “मनोज जरांगे यांनी जी भूमिका घेतली आहे, ती योग्य नाही. ते कधी ओबीसीतून आरक्षण मागतायत तर कधी कुणबी दाखले मागतायत. अशा वेगवेगळ्या मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून पुढे येतायत. मुळात आम्हाला कुणाचं आरक्षण नको आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे, ही मागणी मराठा आंदोलकांची होती.”

हेही वाचा- “…तर माझी अंतयात्रा निघणार”; मनोज जरांगेंची टोकाची भूमिका, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीसांच्या काळात गायकवाड आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकवला होता. त्याला स्थगिती मिळाली नाही. दुर्दैवाने आज मराठा समाजाचं जे आरक्षण गेलंय, ते महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. मनोज जरांगे आंदोलन करतायत. त्यांना पाठिंबा मिळतोय. याला कुणी विरोध करण्याचं काही कारण नाही. पण माझी अट एवढीच आहे की, आपण ओबीसीमधून जे आरक्षण मागत आहात, ते योग्य नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मराठा समाजाची मागणी स्वतंत्रपणे आरक्षण मिळालं पाहिजे, कुणाच्या आरक्षणात आम्हाला भागीदारी नको, अशी आहे,” असंही विखे पाटील म्हणाले.