मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. फडणवीस मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा जरांगे यांनी केला होता. जरांगेंच्या या आरोपांनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. फडणवीसांनी मात्र हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता जरांगे यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहतायत, असं जरागे म्हणालेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरोधात आणखी एक डाव रचला आहे. फडणवीस हे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला घडवण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा कोणता कार्यकर्ता माझ्यावर हल्ला करायला येतो, तेच बघतो मी. म्हणूनच मी बाहेर पडलो आहे,” असं जरांगे म्हणाले.
“हल्ल्यासाठी महिला पाठवण्यात आल्या”
फडणवीस चुकीच्या माणसाच्या मागे लागले आहेत. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण स्वीकारावे म्हणून मला त्रास दिला जातोय, असा दावा यावेळी जरांगेंनी केला. “हा प्रयोग त्यांना बहुतेक छत्रपती संभाजीनगरातच करायचा होता. महिलांचा आदर केला पाहिजे, असं ते सांगतात. छत्रपतींचा विचार घेऊन पुढे जात आहोत, असा ते दावा करतात. मात्र हल्ल्यासाठी महिला पाठवण्यात आल्या. गृहमंत्र्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाणे योग्य नाही. मराठा समजाला दिलेले १० टक्के आरक्षण मी स्वीकारावे म्हणून हे केले जात आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे चुकीच्या व्यक्तीच्या नादाला लागले आहेत. फडणवीस यांना अशा प्रकारच्या गोष्टी शोभत नाहीत,” अशी टीका जरांगे यांनी फडणवीसांवर केली.
जरांगेंनी याआधी काय आरोप केले होते?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बोलताना फडणवीसांवर आरोप केले होते. मला सलाईनच्या माध्यमातून मारून टाकण्याचा फडणवीस प्रयत्न करत आहेत. मला मारण्याचा कट रचला जातोय. फडणवीस माझं एन्काऊंटर करू पाहतायत, असे वेगवेगळे आरोप जरांगेंनी केले होते. या आरोपानंतर फडणवीस तसेच भाजपाचे इतर नेते चांगलेच आक्रमक झाले होते. जरांगेंच्या या आरोपांचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले होते. जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली होती. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी ही एसआयटीच्या माध्यमातून करण्याचे निर्देश दिले होते.