Maratha Reservation Prakash Ambedkar vs Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. यावरून दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे की त्यांनी या राजकारणाला बळी पडू नये. तसेच त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आवाहन केलं आहे की त्यांनी मराठा व ओबीसी आरक्षणाविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्याचबरोबर मराठा आरक्षणप्रश्नी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

“मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करू, आम्ही त्यांच्याबरोबर असू, त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आणणार नाही”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर म्हणाले, “मुळात प्रश्न असा उद्भवतो की तुमच्या (शरद पवार) पक्षाची भूमिका काय आहे? मराठा आरक्षणाबाबत तुमच्या पक्षाने कोणती भूमिका घेतली आहे ते आधी जाहीर झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाने आरक्षणावर कोणती भूमिका घेतली आहे ते सांगावं. स्वतःची भूमिका जाहीर न करता मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही तुमचा पक्ष गुंडाळून टाका, तुमच्या पक्षाची गरज नाही.”

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे काही मराठा कार्यकर्ते, मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी मंगळवारी (३० जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’ (मुंबई) या त्यांच्या निवासस्थानी भेटले. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी मराठा कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं की “केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी मी आमच्या पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पाठवणार आहे.” उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा >> Amol Mitkari : मनसे कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांचा कट? अमोल मिटकरींचं सूचक वक्तव्य; राष्ट्रवादी मोर्चा काढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसंदर्भात म्हणजेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसंदर्भात घेतलेली भूमिका मी दुर्दैवी मानतो. उद्धव ठाकरे हे मनोज जरांगेंच्या मागणीच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. ते सांगण्याऐवजी ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. त्यांनी आरक्षण वाढवलं की मराठा समाजाला न्याय मिळेल. ही त्यांची भूमिका मला पटलेली नाही.