सांगली : मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ७० जागांवर आमचा निश्चित विजय होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीत व्यक्त केला. शनिवारी सांगलीत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, संजय राऊत यांना काड्या करण्याची सवय आहे. महायुतीमध्ये काड्या टाकण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. मात्र, आजअखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही.
आम्ही कुणी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. हिंदी भाषिक असलेल्या भागात गेल्यानंतर स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या भाषेत बोलावे लागते. त्यामुळे मराठी भाषेबद्दल वेगळे बोलण्याचा मंत्री सरनाईक यांचा उद्देश नव्हता, असे सांगत त्यांनी सरनाईक यांची पाठराखण केली.
मनसे आणि शिवसेना ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, दोन्हीकडून जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे चुकीचे ठरेल. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली आहे. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले आहेत. यामुळे अधिकृत जाहीर होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करता येणार नाही.
दरम्यान, मंत्री देसाई यांनी नातेवाईक असलेल्या काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचा पाटील कुटुंबीयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, दंडोबा याचबरोबर सांगलीला नैसर्गिक लाभलेला कृष्णाकाठ याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी योजना करण्यात येईल. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुरेश खाडेही उपस्थित होते.