प्रसारमाध्यमेही करोनाची आकडेवारी तपासून पाहत नाही. सरकारडून आलेली आकडेवारी देतात. आता अधिवेशन काळामध्ये मोर्चे घेऊन अनेकजण सरकारकडे आपली मागणी मांडतात. मात्र राजकीय मोर्चांवर बंदी घालून आम्हाला प्रश्न विचारायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलीय. केवळ अधिवेशन टाळण्यासाठी करोना वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे असा आरोपही देशपांडेंनी केलाय. तसेच मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत असा आरोपही देशपांडेंनेही केलाय. अधिवेशन टाळण्यासाठी ठाकरे करोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत का?, अशा प्रश्न देशपांडेंनी विचारला आहे. "वीज बिलांवर एवढं आंदोलन सुरु आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कधी लाईव्ह केलं नाही. ते त्या प्रश्नावर का बोलत नाहीत. का लोकांच्या नोकऱ्यांबद्दल बोलत नाही. तुम्ही नीति आयोगाला सांगता कार्यालयीन वेळा बदला तुम्ही मंत्रालयाच्या वेळा का नाही बदलत. वर तुम्ही लोकांना सांगता मी काय बोलतो तुम्हाला ऐकू येत आहे पण तुम्ही काय बोलता मला ऐकू येत नाही. हे काय चालवलं आहे? ही कुठल्या पद्धतीची लोकशाही आहे? लोकांना घरात डांबायचं. त्याच्या नोकरीचा विचार करायचा नाही. बँका त्यांच्याकडून हफ्ते वसूल करतायत. लोकांना त्यांच सोनं नाणं गहाण ठेवलं आहे, त्यांच्या नोकऱ्या गेल्यात, त्यांनी खायचं काय याबद्दल बोलायचं सोडून लॉकडाउन करुन घरात डांबून ठेवायच्या धमक्या देतायत. तुम्हाला घरात बसायचं असल्याने तुम्ही लोकांना घाबरवताय," अशा शब्दांमध्ये देशपांडे यांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका केलीय. मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं असल्याने ते महाराष्ट्राला लॉकडाऊनची धमकी देणार का?; मनसेचा हल्लाबोल "फक्त महाराष्ट्रात येतो का करोना? हे सगळं प्लॅनिंग करुन सुरु आहे"#MNS #UddhavThackeray #CM #coronavirus #COVID19 @mnsadhikrut @SandeepDadarMNS #Lockdown — LoksattaLive (@LoksattaLive) February 22, 2021 धार्मिक स्थळ उघडल्याने करोनाची वाढ झाली असं म्हणत असाल तर ती उघडून किती काळ झाला आहे. परिणाम दिसायचा तर तेव्हाच १५ दिवसात दिसला असता. आता कसा दिसतोय हा परिणाम. करोनाला काय शिकवून पाठवलं आहे का की अधिवेशनाच्या काळात वाढायचं आणि नंतर कमी व्हायचं?, लोकं मास्क लावूनच फिरतायत. पण तुम्ही लोकांना जबाबदार धरताय कारण तुम्हाला प्रश्नांपासून पळ काढायचा आहे, असा टोला देशपांडेंनी लगावला आहे. "सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो," असं खोचक ट्विटही देशपांडे यांनी केलं आहे. सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021 आठ दिवसांमधील राज्यातील करोना रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र राज्यातील ठाकरे सरकार हे जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. देशपांडे यांनी बरोबर अधिवेशनाच्या काळामध्येच करोना कसा वाढला असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीयत म्हणून सरकार आता लॉकडाउनची धमकी देऊ लागलं आहे का?, असा प्रश्न टीव्ही नाईन मराठीशी बोलताना विचारला आहे. "बरोबर राष्ट्रवादीच्याच लोकांना होतो का करोना?, शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन सुरु आहे तिकडे नाही झाला करोनाचा फैलाव. फक्त महाराष्ट्रात येतो का करोना? हे सगळं प्लॅनिंग करुन सुरु आहे. अधिवेशन घ्यायचं नाही. अमरावतीमध्ये कुठेतरी चाचण्या वाढवायच्या आणि संख्या वाढलेली दाखवायची. मग लोकंच कशी जबाबदार आहे दाखवायला मार्शलला कारवाई करायला लावलीय. पाणी प्यायला लोकं मास्क खाली घेतात तरी करावाई करतात. म्हणजे लोकं बेजबाबदार वागतायत हे सिद्ध करण्यासाठी मार्शलला टार्गेट द्यायचं. लोकांना घाबरवण्यासाठी हे धंदे सुरु आहेत का? एवढ्या महिने बसमध्ये चेंगराचेंगरीत लोकं जातात तेव्हा नाही झाला करोनाचा फैलाव. पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलं तेव्हा नाही झाला फैलाव. आताच कसा अधिवेशन काळात झाला करोनाचा फैलाव?," असा प्रश्न देशपांडेनी विचारला आहे.