मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडे असलेल्या खात्यांकडून वीजबिलाची थकबाकी व अनुदान मिळत नसल्याची तक्रार ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नितीन राऊत यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीत सगळे ठीक आहे. वीजबिल थकबाकीचे पाप भाजपच्या राजवटीतील असून ऊर्जामंत्र्यांचे विधान योग्य नसल्याचे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने राऊत यांना घरचा अहेर मिळून काँग्रेसमधील दुफळी समोर आली. ग्रामविकास, नगरविकास विभाग थकबाकी देत नाही तर वित्त विभाग अनुदान देत नाही अशी तक्रार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ऊर्जाखाते काँग्रेसकडे आहे. वीजबिल थकबाकीमुळे वीजखरेदीत अडचण येऊन राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाल्यास काँग्रेसवर आरोप होऊ शकतात. मात्र, महाविकास आघाडी म्हणून सरकार निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देणार असल्याचे सांगितले असून राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे नितीन राऊत म्हणाले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे विचारणा केली असता, वीजबिल थकबाकीचे संकट भाजपच्या राजवटीत निर्माण झाले. हे भाजपचे पाप आहे. ऊर्जामंत्र्यांनी केलेले विधान बरोबर नाही, असा घरचा अहेर पटोले यांनी दिला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर लक्ष घातले पाहिजे. महाविकास आघाडीत सगळं ठीक आहे. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याची बाजू मांडतो, असेही त्यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या काळात सगळी खाती ते एकटेच चालवायचे अशी टीकाही नानांनी केली आहे.