महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. सोमवारी दुपारी न्यायालयाने हे अपिल दाखल करून घेतले आहे.    
रायगड जिल्ह्य़ातील वढाव परिसरात महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र वढावमधील काही ग्रामस्थांनी या स्मारकाला विरोध केला आहे. स्मारकामुळे गावातील गुरचरणाची जागा नष्ट होणार असून नैसर्गिक नाले नष्ट होणार असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. हे स्मारक समाजोपयोगी नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचे हे आक्षेप फेटाळले होते. तसेच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकासाठी जागा घेण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचेही नमूद केले होते.    मात्र उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री दत्ताजीराव खानविलकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली होती.