अहिल्यानगर : राज्य सरकारचे जेथे प्रसिद्धी मिळते तेथेच केवळ लक्ष आहे. राज्यातील गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. अनेक गडकोट, किल्ल्यांकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. राज्य सरकार किल्ले संवर्धनाबाबत उदासीन असल्याने आगामी अधिवेशनात आपण संवर्धनाची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. खासदार नीलेश लंके यांनी गेल्या शिवजयंतीपासून राज्यातील गड -किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धनाची मोहीम सुरू केली आहे.

गेल्या शिवजयंतीदिनी त्यांनी शिवनेरी येथे मोहीम राबवली. आज, रविवारी बहादुरगड-धर्मवीरगड (ता. श्रीगोंदा) येथे मोहीम राबवण्यात आली. या गडावर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांनी अखेरचा संघर्षाचा काळ घालवला आहे. या मोहिमेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक ठिकाणचे तरुण सहभागी झाले होते. त्यावेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

धर्मवीरगड राज्य सरकारच्या ताब्यात आहे तर तेथील दोन पुरातन मंदिर केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपण संसदेच्या अधिवेशनात लक्ष वेधू असे खासदार लंके यांनी सांगितले. मोहिमेत खासदार लंके यांच्यासह तरुण सहभागी झाले होते. मोठ्या आकाराच्या डस्ट बिन प्लास्टिक व कचरा गोळा करण्यासाठी, कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या. झाडांना रंगरंगोटी करण्यात आली, झाडांना पाणी घालण्यात आले.

महिलेवर अन्याय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन घेतले, याकडे लक्ष वेधले असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मराठ्यांची राजधानी असलेला रायगड किल्ला आणि रायगड जिल्ह्याचे प्रश्न अजून सुटलेले नसताना इतर जिल्ह्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे. रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना सुरुवातीला जाहीर करण्यात आले. पण नंतर महिलेवर अन्याय केला जात आहे. चार महिन्यांपासून पालकमंत्री पदापासून दूर ठेवले जात आहे. पालकमंत्री पद नसल्यामुळे रायगड जिल्ह्याला विकासापासून कसे दूर ठेवले जात आहे, हे आपण पाहतच आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रायगडमध्ये कोण कोणाच्या पाया पडले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी वाटपाबाबत अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा होत आहे, याकडे लक्ष वेधले असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, अशा बातम्या बाहेर येतच असतात. मात्र भेटीदरम्यान कोण कोणाच्या पाया पडले, याबाबत मी बोलणार नाही.