लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीसह देशातील पाच लोकसभा मतदारसंघात हिंसाचार व घातपात घडवून आणण्याची योजना नक्षलवाद्यांनी आखली आहे. ‘रेडकॅरिडॉर प्लॅन’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या योजनेची खबर गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली असून या पाचही मतदारसंघातील पोलीस यंत्रणेला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत होणारा हिंसाचार लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने यावेळी नक्षलग्रस्त भागांमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार येत्या १० एप्रिलला या भागात मतदान होणार आहे. प्रचाराच्या काळात नक्षलवाद्यांनी पाच मतदारसंघात िहसाचार घडवून आणण्याची योजना आखली आहे. यात गडचिरोली, छत्तीसगडमधील बस्तर, ओरिसातील मलकानगिरी व नवरंगपूर आणि बिहारमधील गया-जमुई या मतदार संघांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी या योजनेला ‘रेडकॉरिडॉर प्लॅन’ असे नाव दिले आहे. हिंसाचार घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी त्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेले मतदारसंघ निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघांमध्ये मोठी हिंसक कारवाई घडवून आणण्याची योजना नक्षलवाद्यांनी आखली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात काही नक्षलवादी नेत्यांमध्ये झालेला संवाद गुप्तचर यंत्रणांनी टिपला असून त्याचा आधार घेऊन या पाचही मतदारसंघातील पोलीस व सुरक्षा दलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नक्षलवाद्यांनी आखलेल्या या योजनेच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने पोलीस-सुरक्षा दलाशी योग्य समन्वय ठेवून प्रत्येक कृती करावी व स्थानिक पातळीवर हालचाली करतांना कोणतीही हयगय होता कामा नये, असेही गुप्तचर यंत्रणांनी बजावले आहे.