भाजपाची अवस्था भस्मासुरासारखी झाली आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता ती शिवसेनेच्या मुळावर उठणार आहे. त्यांना देशात कोणताही दुसरा पक्ष नको आहे .भाजपाचे काँग्रेसीकरण झाले असून ज्यांनी पक्षासाठी काम केलं आहे ते लोक सतरंज्या उचलण्याचे काम करीत आहेत आणि आम्ही मोठे केलेले लोक त्यावर जाऊन सत्तेची गणिते आखत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

“भाजपा सरकारने केवळ आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केली आहे. काहीजणांना अमिष, भिती दाखवली जात आहे, पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, भाजपामधील निष्ठावंत सतरंजी उचलत असून आमच्या येथुन गेलेले सत्तेच्या खुर्चीवर बसलेत आहेत”, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

शिवसेनेवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “सत्तेच्या गुळाला मुंगळा चिकटतो तसे सेनेचे झाले आहे”. छत्रपती उदयनराजे यांच्या यात्रेच्या उपस्थितीवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, “उदयनराजे हे छत्रपती आहेत . त्यांनी काय करायचे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांची इच्छा असेल तर ते आमच्या यात्रेत संध्याकाळी सामील झालेले आपल्याला दिसतील”, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं. यावेळी खासदार अमोल कोल्हे व पदाधिकारी उपस्थित होते.