दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं. “दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला आहे. मरकजचा हा कार्यक्रम टाळता आला असता. महाराष्ट्रात असं घडू देऊ नये,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी आज (गुरूवार) पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.
“दिल्लीत मर्कजच्या आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता,” असं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असं ते म्हणाले. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी होणारा कार्यक्रमही पुढे ढकलावा अशी विनंती त्यांनी केली.
आणखी वाचा- महाराष्ट्र बनले करोनाचे हॉटस्पॉट!
सरकारकडून अनेक प्रयत्न
“करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात आली. परंतु त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे असं दिसतंय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहेत,” असं पवार यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना सरकारनं दिलेल्या सुचनांचं पालन करण्याची विनंती केली. “९० टक्के लोक सूचनांचं पालन करतायत पण १० टक्के लोकांकडून ते होत नाही. सर्वांनी नियम पाळून सरकारला सहकार्य करावं. लोकं आजही मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. आपल्याकडे भाजीपाल्याची कमतरता नाही. सर्व उपयययोजना असताना त्या मिळणार नाही अशा भावनेनं लोकांनी गर्दी करू नये. सराकरनं ज्या काही सुचना दिल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.